विनम्रता एकदा एक राजा त्याच्या प्रधान, सेनापती आणि सैनिकांसह शिकारीला निघाला वाटेत अरण्यात पुढे त्यांची ताटातूट झाली. मग प्रधानाने राजाच्या शोधार्थ सैनिकाला पाठवले अरण्याच्या मध्यभागी एका साधूची झोपडी होती. साधू झोपडीच्या बाहेर झाडाखाली बसलेला असतो. पण तो साधू आंधळा असतो. सैनिक साधूच्या जवळ येतो आणि घोड्यावरूनच विचारतो, काय रे गोसावड्या आमच्या महाराजांना हिथून जाताना पाहिलेस काय? त्यावर तो साधू त्याला सांगतो, बाबा रे मी दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे, मला कस काय दिसणार. सैनिक म्हणला अरे आंधळा आहेस म्हणून काय झालं पण बहिरा तर नाहीस ना? घोड्याच्या टापाचा काही आवाज वगैरे ऐकला असशील. साधू म्हणतो नाही तस काही मी ऐकल नाही. सैनिक तिथून कोणाला तरी शिव्या देत निघून जातो. मग थोड्या वेळाने तिथे सैनिकांचा नाईक तिथे पोहचला तो म्हणाला, काय हो साधूबुवा ईथून आमचे महाराज गेलेत काय? साधू म्हणतो, नाही रे बाबा तुमचे महाराज नाही आले इकडे, पण एक शिपाई मात्र राजेसाहेबांचा शोध करीत आला होता तो उत्तरेच्या दिशेने गेलाय.
थोड्या वेळाने तिथे सेनापती आला तो
म्हणाला. साधू महाराज इथून आमचे राजेसाहेब गेले असल्याचे आपणांस काही कळले काय.
साधूने त्यालाही वरील प्रमाणे उत्तर दिले. थोड्या वेळाने तिथे स्वतः प्रधान आला, आणि तो म्हणाला सूरदासजी महाराज आम्ही शिकारीला आलेल्या आमच्या
राजेसाहेबांच्या शोधात आहोत. ते इकडे आल्याचे आपणाला काही कळाले का?
आणखी थोड्या वेळाने
तिथे स्वतः राजाच आला. त्याने त्या साधूबुवांना प्रणाम केला आणि विचारले, महाराज आपल्या चरणी माझे प्रणाम असावेत. मी तहानेने व्याकुळ झालोय, भगवन् आपली अनुमती असेल तर आपल्या आश्रमातील थोडेसे पाणी मी पिऊ
इच्छितो.
त्यावर
साधू म्हणाला राजा तुझे स्वागत असो पण तू थकून-भागून आला आहेस, त्यामुळे तू एकदम पाणी पिऊ नकोस, मी
तुला काही फळ खायला देतो ती खा आणि मग पाणी पी. राजा म्हणाला, प्रज्ञाचक्षु भगवान् मी राजा आहे हे आपण कसे ओळखले? माझ्या शोधार्थ इथे कोणी आले होते काय? साधू म्हणाला होय महाराज, तुझा शोध
करीत प्रथम एक शिपाई आला होता, मग शिपायांचा नाईक
आला, त्यानंतर सेनापती, मग प्रधानजी आले होते. राजा म्हणाला महाराज आपण त्यांचे अधिकार कसे
काय ओळखलेत?
साधू म्हणाला त्यांच्या बोलण्याच्या
शैलीवरून. जो जितका श्रेष्ठ असेल तितकी त्याची भाषा नम्र आणि मृदू असते.
शिपायाने मला गोसावड्या असे म्हटले. तर नाईकाने साधूबुवा असा माझा उल्लेख केला.
त्यानंतर सेनापती आला त्याने मला साधू महाराज असा आवाज दिला. प्रधानाने मला
सूरदासजी महाराज असे संबोधले. आणि तू जेव्हा माझा भगवन् म्हणून माझा गौरव केलास, तेव्हाच मी ओळखले हा राजाच असला पाहिजे. कारण राजा नम्र, मृदू आणि शिलाने श्रेष्ठ असतो. या उलट हीन लोक नेहमी कठोर आणि कर्कश
बोलतात.
दुसऱ्याला दुखावतात. उदार आणि परोपकारी मनाचे लोक
नम्र असतात त्यांचे बोलणे आणि वागणे मृदू आणि मनोहर असते. चंद्र किरणात स्नान
करावे, केशर-कस्तुरी मिश्रीत जलाचे सिंचन व्हावे, पुष्पपरागांचा वर्षाव व्हावा. अथवा मलयनिलांच्या मंद मंद लहरी
याव्यात, असे उदार मनाच्या माणसाचे बोलणे आणि
वागणे असते. ज्यांच्या अंतःकरणात सर्वांच्या विषयी परमेश्वराचा भाव असतो त्यांची
वागणूक देखील नम्र असते.
*“नम्र झाला भूता | तेणे
कोंडिले अनंता ||”*
अस संत तुकोबाराय सांगतात, आम्हीही विनम्र व्हावं आणि त्यापद्धतीने आमचं जगणं बोलणं व्हावं. जे
आमच जगणं प्रतिबिंबित करेल. समृध्दीच्या काळात विनम्रता आणि संकटाच्या काळात
सहनशिलता असावी. मानवाचा सर्वश्रेष्ठ गुण म्हणजे कृतज्ञता. |
मूर्खाची ओळख खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक कामगार आपल्या गाढवासोबत जंगलातून चालला होता. इतक्यात रस्त्याच्या बाजूला त्याला काही चमकताना दिसलं. त्यानं जवळ जाऊन पाहिलं तर तिथे एक चमकणारा दगड पडलेला होता. त्यानं तो उचलून आपल्या गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि पुढे चालू लागला.
समोरून येणाऱ्या एका हिरे व्यापाऱ्यानं
गाढवाच्या गळ्यात अडकवलेला तो मौल्यवान दगड बघितला. मग त्यानं गाढवाच्या मालकाला
विचारलं, ‘भाऊ मला हा दगड विकत घ्यायचा आहे. तुम्ही
याचे किती पैसे घेणार?’. कामगाराला दगडाच्या
किंमतीबाबत काहीच कल्पना नव्हती. फक्त शंभर रूपये घेईन, असं त्यानं सांगितलं. त्यावर हिरे-व्यापारी म्हणाला ‘शंभर रूपये तर
खूप जास्त आहेत. मी फक्त पन्नास रूपयापेक्षा अधिक रक्कम नाही देणार.’ कामगारानं
थोडा विचार केला आणि शंभर पेक्षा कमी रुपये घेणार नाही, असं सांगितलं. व्यापाऱ्याला वाटलं की या मौल्यवान दगडासाठी त्याला
कोणी गिऱ्हाइक मिळणार नाही. मग हा कामगार ५० रुपयात हा दगड विकण्यासाठी आपल्या
मागं येईल.
थोडावेळ जाऊनही कामगार त्या व्यापाऱ्याजवळ आला
नाही. अखेर व्यापारीच त्याच्या शोधात निघाला. त्याला दिसलं की दुसरा एक व्यापारी
त्याच्याकडून तो मौल्यवान दगड विकत घेत आहे. तो व्यापारी पळत कामगाराजवळ
पोहोचला. तोपर्यंत व्यवहार पूर्ण करून समोरचा व्यापारी निघून गेला. त्या
व्यापाऱ्यानं कामगाराला विचारलं की, ‘तो दगड तू किती
रुपयांना विकला?’. कामगार म्हणाला, ‘२०० रुपये’. व्यापाऱ्यानं त्याला म्हणाला, ‘अरे
मुर्खा तो दगड अत्यंत मौल्यवान होता आणि तू अवघ्या २०० रुपयांना विकलास!’ त्यावर
कामगार उत्तरला, ‘मूर्ख मी नाही, तुम्ही ठरलात. कारण मला तर तो दगड रस्त्याच्या बाजूला पडलेला मिळाला
होता आणि त्याची किंमत माहित नव्हती. पण तुम्हाला त्याची किंमत माहित असून देखील
तुम्ही अवघ्या ५० रुपयांच्या हव्यासापोटी तो दगड विकत घेतला नाही. १०० रुपयात तो
दगड विकत घेतला असता तर भविष्यात तुम्हाला मोठा फायदा मिळाला असता.’ |
युध्दातला हत्ती एका राजाजवळ एक हत्ती
होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला
योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा
त्यात विजयी झाला.
काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध
होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे
त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. एकेदिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी
पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढेपुढे गेला आणि दलदलीत
फसला.
वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून
निघणे शक्य नव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू
लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावत आले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी
त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली.
कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व
शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती
बाहेर येऊ शकला नाही.भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले.
राजापर्यंत हि वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी
माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला, राजा
शेजारीच उभा होता. त्याने राजाला असा सल्ला दिला,”महाराज! तत्काळ युद्धाचे नगारे वाजवा, सैन्य
या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा
सैनिकांना द्यायला सांगा.” राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे
वाजविण्याचा हुकुम दिला. मग काय म्हणता, नगारे
वाजू लागले, सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे
लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या.
त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला.
त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या माहुताचे आभार मानले
आणि बक्षीस दिले.
ध्यानात ठेवा- निराशावादी
विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते. जर नशीब काही
‘चांगले’ देणार असेल तर त्याची सुरुवात ‘कठीण’ गोष्टीने होते .. आणि नशीब जर काही ‘अप्रतिम’ देणार असेल तर
त्याची सुरुवात ‘अशक्य’ गोष्टीने होते….! |